ही कादंबरी 'ल्यूकोडर्मा' नावाच्या त्वचारोग या अत्यंत संवेदनशील विषयावर तसेच या व्याधीच्या सामाजिक संबंधित कलंकांभोवती विणलेली आहे.

महाश्वेता रिव्हिव्ह - Mahasweta Book Review
 महाश्वेता रिव्हिव्ह - Mahasweta Book Review

एक माणूस जो केवळ तिच्या सौंदर्यावर प्रेम करतो, एक मुलगी जिला फक्त तिच्या सौंदर्याने तोलले जाते, परंतु तिच्या भावनांनी नाही. हे स्त्रीच्या आंतरिक सामर्थ्याचे चित्रण करते. कारण तिला मदत करण्यासाठी कोणीही नसताना तिने स्वतःला सर्वोत्तम मार्गाने शोधले. हे अशा काही पुस्तकांपैकी एक आहे जे तुम्हाला रडवतील किंवा काही सामाजिक समस्या आणि निषिद्धांबद्दल तुमच्या भूमिकेवर पुनर्विचार करायला लावतील. हे एक अतिशय साधे आणि आश्चर्यकारकपणे लिहिलेले काम असूनही ते आपल्यासाठी वास्तविकता तपासणी म्हणून कार्य करते. करुणा, सहानुभूती, बिनशर्त प्रेम आणि मैत्री या मूलभूत मानवी भावना आहेत ज्या कधीकधी दैनंदिन जीवनात आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये विसरल्या जातात.

एक काळ असा होता की ल्युकोडर्मा/कुष्ठरोग हा देवाचा शाप मानला जात असे. ज्या लोकांना असे आजार होत असत त्यांना समाज बहिष्कृत करत असत. मला तो काळ आठवतो आणि तो चांगला आठवतो कारण मी शिक्षण घेत असताना तसेच हॉस्पिटल मध्ये प्रॅक्टिस करताना या आजाराला आळा घालण्यासाठी आणि जनसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी मी स्वतः देखील अनेक मोहीम राबवले आहेत.

ही कथा अनुपमा म्हणजेच अनु नावाच्या मुलीभोवती फिरते, जी अतिशय सुंदर, हुशार आणि मनाने चांगली व्यक्ती आहे. ती अभिनयात, अभ्यासात उत्तम आहे. तिच्या अभिनय कौशल्यामुळे ती सेवाभावी हेतूने विविध नाटकांचे आयोजन करते. तिच्या अशाच एका नाटकादरम्यान, एक हुशार, प्रसिद्ध आणि देखणा पुरुष डॉ. आनंद तिच्या सौंदर्याने मंत्रमुग्ध होऊन तिला लग्नाचा प्रस्ताव पाठवतो.

अनुची सावत्र आई म्हणजेच सबाक्का तिच्यापासून मुक्त होऊ इच्छित असते म्हणून ति तो लग्नाचा प्रस्ताव स्वीकारते. अनु ही मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याने लग्नाचा खर्च परवडत नाही म्हणून डॉ. आनंद आणि त्यांची आई रद्दक्का लग्नाचा संपूर्ण खर्च उचलतात. एखाद्या परीकथेप्रमाणे तिचे लग्न डॉ. आनंदशी होते.

त्यांच्या लग्नानंतर, पुढे डॉ. आनंद उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला जातात आणि अनु तिची पहिली दिवाळी असते म्हणून त्याच्या आईच्या आग्रहास्तव, अनु दोन महिने बंगलोरमध्ये राहते कारण त्याच्या आईला लक्ष्मीपूजन करायचे आहे, पूजा करण्यासाठी अनु ईथेच राहते.

एके दिवशी तिला तिच्या शरीरावर आलेला एक पांढरा ठिपका जो ल्युकोडर्मा आहे हे कळेपर्यंत तिच्या आयुष्यात सर्व काही ठीक चालले होते. तिच्या या अवस्थेमुळे ती व्यथित होते. मात्र हा आजार असल्याने तिची सासू तिला घराबाहेर काढते. अनुला मनातून असे वाटत होते की तिचा नवरा स्वतः एक डॉक्टर आहे तर तो तिची स्थिती नक्कीच समजून घेईल, ती डॉ. आनंदकडून भावनिक आधार आणि सुखदायक शब्द शोधते, स्वतः डॉक्टर असल्याने तिचा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे, पण त्या बदल्यात तिला फक्त त्याचा अलिप्तपणा मिळतो, तोही असंवेदनशील निघाला.

अनुच्या वडिलांचीही तब्येत बरी नसते, तिची सावत्र आई सतत तिला नको नको ते बोलते, तिला तिच्या माहेरच्या घरातूनही आधार मिळत नाही. सर्वात दुःखाची गोष्ट म्हणजे अनुची परिस्थिती माहीत असूनही डॉ. आनंदने तिला कधीच एकही पत्र लिहिले नाही. तिथून पुढे प्रत्येक पावलावर तिच्या विश्वासाची परीक्षा घेतली जाते.

प्रत्येकजण तिच्या त्वचेच्या स्थितीला एक प्रकारचा शाप मानतो आणि तिच्याकडे सतत दुर्लक्ष केले जाते. नैराश्याने, अनुपमाला आत्महत्येचा प्रयत्न करण्यास भाग पाडले जाते. तथापि, अनुपमा ही कमकुवत व्यक्ती नसते आणि तिने सर्व अडचणींविरुद्ध आपले जीवन पुन्हा तयार करण्याचा निर्णय घेतला. गावकऱ्यांच्या टोमण्यांना कंटाळून तसेच आनंदसोबत परत येण्यासाठी प्रदीर्घ लढा दिल्यानंतर, अनुपमा सर्व आशा सोडते. शेवटी अनु स्वतःची चांगली कारकीर्द घडवण्यासाठी एका मैत्रिणीच्या मदतीने मुंबईत येते. जिथे ती पुन्हा नव्याने आयुष्य जगायला शिकते आणि सन्मान आणि यश मिळवते आणि तिच्या पायावर उभी राहते आणि तिला एक सुंदर, संवेदनशील मैत्री देखील मिळते.

शेवटी पश्चाताप झाल्याने डॉ. आनंद तिच्याकडे परत येतो, पण अनु त्याला स्वीकारते का ? ती तिचे जीवन पुन्हा आधी सारखं तयार करू शकली का ? कोणी दुसरा पुरुष तिच्या आयुष्यात येतो का ? केवळ बाह्य सौंदर्याने वेड लागलेल्या समाजातील त्वचेच्या विकृतीच्या कलंकावर तिला पूर्णपणे मात करता आली का ? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुस्तक वाचावे लागेल.

आयुष्यात एकदा तरी हे पुस्तक वाचलेच पाहिजे. यातील पात्रे तुम्हाला आयुष्यात खूप काही शिकवतील, माणूस कसा असावा किंवा नसावा. इथे अनुपमा राखेतून जन्मलेल्या फिनिक्स सारखी भासते. जिने कधीही हार मानली नाही. या कथेतील स्त्री नायक खूप मजबूत आणि स्वतंत्र आहे. यात चारित्र्य विकास, नैतिकता आणि मूल्ये मोठ्या प्रमाणात चित्रित केली आहेत. डॉ. आनंदची विचारांची अपरिपक्वता असो किंवा पूर्वग्रहदूषित समाज, अनुपमा स्वतःसाठी एक जीवन निर्माण करते आणि आनंदी आणि समाधानी जगते. हे दर्शविते की भौतिक गोष्टी तुम्हाला आनंद देत नाहीत आणि धैर्य, शिक्षण, करुणा या बाकी सर्व गोष्टी देखील तुम्हाला आवश्यक आहेत.

हृदयाला भिडणारी ही अतिशय सशक्त कथा आहे. ही कथा एका स्त्रीची जिद्द आणि तिचे आयुष्य जगण्याची जिद्द यांचा उत्तम मिलाफ आहे. एक प्रकारे आपला समाज काय आहे याचा आरसाही दाखवतो. आशा आहे की एक दिवस हा समाज बदलेल.

प्रत्येकाला फक्त प्रेम, आदर, साथ अन् विश्वास हवे असते. ही भ्रम आणि विश्वासघात यांनी ग्रासलेल्या जगात धैर्य आणि लवचिकतेची एक प्रेरणादायी कथा आहे. ही मार्मिक कथा आजही समाजावर राज्य करणाऱ्या पूर्वग्रहांच्या बळींना आशा आणि सांत्वन देते. नायीकेचे पात्र किती शक्तिशाली दाखवले आहे ते मला आवडले.

आयुष्यात अनेक आव्हाने असतानाही तिला एक सुंदर व्यक्ती दाखवण्यात आली आहे. जी कधीही हार मानत नाही आणि चेहऱ्यावर हसतमुखाने प्रत्येक दिवसाचे स्वागत करते.

ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती थेट व्हॉट्सअ‍ॅपवर 
ItsMarathi ला जॉईन व्हा. :- https://chat.whatsapp.com/Hc9Cr4QhIBF77Ion9IzgT7

Post a Comment

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

थोडे नवीन जरा जुने